घननिळा मेघ आज पुन्हा आला बरसाया
पाना फुलासंगे मन पाखराही भिजवाया
भेटीसाठीच तुझ्या रे, मन होते हे आतुर
तरी येण्याने तुझ्या का जिवा लागे हुरहूर?
मऊ आभाळाचं घर मागे ठेवून येतोस
ओळखीचे सूर काही, संगे घेऊन येतोस
ओल्या आठवणींमध्ये, मन घेतं रे हिंदोळे
तुझ्या धारांसंगे नकळत वाहतात डोळे
केले होते ना रे तेव्हाच मी मन माझे कोरे
पुन्हा कशासाठी शोधायचे हळवे कोपरे?
दिस रात रे पावसा, असा नको कोसळूस
जुन्या जखमांच्या तू रे नको खपल्या काढूस
माझ्या मनाचं काहूर नाही कळणार तुला
म्हणताच तोही वाऱ्यासंगे फिरून हसला
मनी माझ्याही दाटती, गतकाळाचे गं ढग
कोसळते धारांतून माझी सारी तगमग
किती काळ कोंडशील त्याच दुःखाची पोकळी
माझ्यापरी बरसून, तूही हो ना गं मोकळी
शेवटचे हुंदक्यांचे, उतू जाऊ देत कढ
चुकलेल्या त्या वाटांची, नको बाळगुस ओढ
भूतकाळाच्या भुतांचे पाश सगळे तुटू दे
आणि कोवळ्या स्वप्नांची नवी पालवी फुटू दे
जुन्या जखमांचे व्रण, चल धुवून टाकूया
हळव्या कोपऱ्यांतही थेंबांची आरास करूया
शोध घेऊन नव्याने पुन्हा भेट तू स्वतःला
क्षण साजरा कराया, साद घाल या सख्याला
बिलगून घे मला तू, दुःख नाही ना उरलं?
दोघे मिळून भिजुया, बघ आता हे ठरलं
सख्या पावसाशी नातं, माझं नव्याने सजलं
सरींमध्ये आता खरं, मन चिंब हे भिजलं
-अनुया
Ati sundar
LikeLiked by 1 person
धन्यवाद 🙂🙏
LikeLike